
कृषी दिनानिमित्त कृषी मेळावा उत्साहात,वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी मेळाव्यात शासनाच्या कृषी विभागातर्फे नोंदणीकृत शेतकऱ्यांना काजू रोपांचे वाटप…
चिपळूण- वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे शेतकरी शेतीपूरक दुग्ध व्यवसायाकडे वळत असल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. यातून वाशिष्ठीने शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेला आपण सगळ्यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण नागरीच्या सहकार भवन सभागृहात बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर चिपळूण नागरीच्या संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, चिपळूण नागरीच्या संचालिका ॲड. नयना पवार, जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, माजी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय सोनावले, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे, मंजिरी कुलकर्णी, जयश्री शिंदे, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालक गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, सोमा गुडेकर, सत्यवान म्हामुणकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी तर सेवानिवृत्त जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व शासनाच्या उद्यानपंडित पुरस्कारार्थी धनंजय केतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाषराव चव्हाण पुढे म्हणाले की, सहकार क्षेत्रात काम करीत असताना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेला आपण सर्वांनी चांगला प्रतिसाद दिल्याने संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तर दुसरीकडे शेतीपुरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी आपला प्रयत्न होता. यातून प्रशांत यादव व स्वप्ना यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची उभारणी केली. हा प्रकल्प आता चिपळूण नागरी पतसंस्थेबरोबरच शेतकऱ्यांसाठी आधारवड बनला आहे. तरी पुढील काळात हा प्रकल्प प्रभावीपणे पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन सुभाषराव चव्हाण यांनी केले.
कृषी क्षेत्रात कोकण संपन्न करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करूया- प्रशांत यादव
प्रास्ताविकात प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वाटचालीचा आढावा घेतला. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांची प्रेरणा असल्याचे नमूद केले. तसेच दुग्ध व्यवसाय, पशुपालन, शेळीपालन या व्यवसायाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी उदरनिर्वाह साधत असल्याचे स्पष्ट केले. यातून रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढत असल्याचे उदाहरण देऊन सर्वांसमोर आणले. वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कोकण संपन्न करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया असे आवाहन श्री. यादव यांनी यावेळी केले. जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात चिपळूण नागरी व वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वाटचालीचे कौतुक केले. सहकार चळवळ मजबुत कशी होईल यादृष्टीने दोन्ही संस्था प्रयत्न करीत आहे. तर यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाठबळ देत आहेत. यामुळे येथील शेतकरी सधन होत असल्याचे आशादायी चित्र पहावयास मिळत असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी यावेळी नमूद केले.
‘वाशिष्ठी ब्रॅण्ड’ यशस्वी- डॉ. सोपान शिंदे
माजी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी आपल्या मनोगतात येथील सेवाकार्यकालाचा आढावा घेतला. चिपळूण नागरीने नेहमीच ‘सहकारातून समृद्धी’ या उक्तीप्रमाणे वाटचाल सुरू ठेवलेली आहे. सहकारात ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ हे ब्रीदवाक्य देखील या संस्थेने जपले आहे. तर आता वाशिष्ठी डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी आधारवड बनला आहे. या प्रकल्पाची यशस्वी वाटचाल सुरू असून हा प्रकल्प अन्य दुग्ध प्रकल्पांप्रमाणे ‘वाशिष्ठी ब्रॅण्ड’ म्हणून यशस्वी झाला आहे, अशा शब्दात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे कौतुक केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचा उपक्रम कौतुकास्पद- शिवाजी शिंदे
उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी कृषी मेळाव्याला संबोधित करताना सांगितले की, कोकण व इथली जमीन निसर्ग संपन्न आहे. अनुकुल शेती करायची असेल तर तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. हवामान बदलाचा सामना करायचा असेल तर जमिनीची जैविक अच्छादन केले पाहिजे, यातून कार्बन वाढतो, आपली जमिन पुढील पिढीसाठी टिकवली पाहिजे. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे. कोकण विभागात मसाले पिकांसाठी चांगले वातावरण आहे. फळ पिकांची लागवडीसाठी ‘सीआरए’ तंत्रज्ञान पद्धत अवलंबली पाहिजे. वाशिष्ठी डेअरीने कृषी मेळाव्याचे केलेले आयोजन हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्या- धनंजय केतकर
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय सोनावले यांनी पशुसंवर्धन विभागातील तर तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी कृषी विभागातील विविध योजनांची माहिती दिली. ‘उद्यान पंडीत’ पुरस्कारार्थी धनंजय केतकर यांनी आपल्याला मिळालेला हा पुरस्कार कोकणवासीयांचा सन्मान असल्याने नमूद केले. या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतीमध्ये निश्चितच फायदा आहे. उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवली पाहिजे. तणनाशक वापरू नका, जमिन नापिक होते. सुपिक जमिन केली पाहिजे. शेती चांगली होती, पुढेही चांगली राहिल. मात्र, आपण सकारात्मक विचार केला पाहिजे. शासन मोफत धान्य देत असल्याने लोकांनी शेती करणे सोडून दिले आहे. मात्र, आपल्याला पुरेल इतक्या धान्यासाठी तरी शेती केली पाहिजे.
सोबत पशुपालन, शेळीपालन, आंबा-काजू लागवड, कुक्कुटपालन आदी व्यवसाय केले तर शेतीबरोबरच पुरक व्यवसायातून आपण चांगले सधन होऊ शकतो, असे धनंजय केतकर यांनी यावेळी सांगितले. तर शासनाचा उद्यानपंडित पुरस्कार मिळण्यापूर्वी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आपली प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण करून दिली. यामुळे प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांचा आभारी असल्याचे श्री. केतकर यांनी सांगितले. तर या पुरस्काराबद्दल शासन व कृषी विभागाला श्री. केतकर यानी यावेळी धन्यवाद दिले. राजेश कदम यांनी विषमुक्त शेती संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शासनाच्या ‘ मागील त्याला काजूची रोपे’ या उपक्रमांतर्गत कृषी विभागाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे काजूच्या रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*