
राजापूर : पर्यटन संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सुरू असलेल्या राजापूर शहरातील ब्रिटीशकालिन वखार सुशोभिकरण प्रकल्पाच्या बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात ढासळल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेची दखल घेत राजापूर नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी काम सुरु असतानाच काही भाग खचल्याचे व काम निकृष्ट दर्जाचे दिसून आले. संबंधितांकडून झालेल्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश नगराध्यक्षा खलिफे यांनी प्रशासनाला दिले आहेत. राजापूर शहराच्या मध्यवर्ती विभागामध्ये प्राचीन ब्रिटिशकालीन वखार परिसराच्या सुशोभिकरणाचे काम पर्यटन संचालनालयामार्फत सुरू असुन शासनाकडून त्यासाठी सुमारे २ कोटी रु. निधी मंजूर झाला आहे. यातून परिसरातील इमारतीची दुरूस्ती तसेच परिसर सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे परिसरातील चिरेबंदी बांधकाम ढासळले आहे. अगदी सुरूवातीच्या पावसातच हे बांधकाम कोसळल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षा सौ. खलिफे यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले. तसेच या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी तसेच पर्यटन संचालनालय विभागाकडे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
यावेळी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती सौरभ खडपे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता स्वप्नील पड्यार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, संदेश जाधव तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

