
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटात चौपदरीकरणासाठी तोडलेल्या डोंगराची दरड पावसामुळे महामार्गावर काेसळल्याने घाटात महामार्गाची एक मार्गिका बंद हाेऊन वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना गुरुवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
महामार्ग विभागाने ही दरड बाजूला केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. लांजा तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडत असून, जलसाठ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे. मात्र, पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या डोंगराची माती रस्त्यावर आली. वेरळ घाटात महामार्ग चौपदरीकरण कामासाठी बाजूचे डोंगर तोडून माती वापरण्यात आली आहे. बाजूच्या डोंगरांवरून पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहत असतो. गेले तीन दिवस पावसाचे प्रमाण वाढल्याने बाजूला असलेल्या डोंगरावर माती पाण्याबरोबर महामार्गावर वाहून आली. गुरुवारी तासभर वेरळ ते देवधे दरम्यान महामार्गावरील वाहतूक मंदावली होती.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर