पहिल्याच पावसाने रत्नागिरी शहरात उडवली दाणादाण,मधला फगवठार येथे संरक्षक भिंत कोसळली; शहरातील अनेक भागात पाणीच पाणी…

Spread the love

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात सोमवारी रात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला चांगलंच झोडपून काढलं. मान्सून सक्रिय होताच पहिल्याच मोठ्या पावसात शहराची पुरती दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, दरडी ढासळणे यांसारख्या दुर्घटना घडल्या, तर प्रशासनाच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. शहरातील मधला फगवठार येथे सुमारे 70 फुट संरक्षक भिंत ढासळल्याने तेथील लोकवस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला, त्यामुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

रत्नागिरी जिल्हाभरात दमदार पावसाला प्रारंभ झालेला आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या वादळी पावसाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश झोडपून काढले आहे. सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून जनजीवन दाणादाण उडाले आहे.

रत्नागिरी शहरातील मधला फगरवठार येथे मंगळवारी सकाळी 7 वाजता संरक्षक भिंतीच्या खालील बाजूची माती मोठ्या प्रमाणात ढासळल्याने सुमारे 70 ते 80 फूट लांब संरक्षक भिंत प्रचंड आवाजासह कोसळली. या दुर्घटनेमुळे मधला फगरवठारकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. नगर परिषदेने तो रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद केला आहे. तसेच खालच्या फगरवठार परिसरातील घरांनाही आता मोठा धोका निर्माण झाला आहे. या दरडीखाली लागूनच लोकवस्ती असल्याने तेथील नागरिकांना खबरदारीच्या सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

फगरवठार येथे रस्त्याची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे शेजारील आंब्याचे मोठे झाडही उन्मळून पडले. त्यामुळे विजेच्या तारा तुटून मधला व वरचा फगरवठार परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच न.प.प्रभाग 1 चे नगरसेवक व पाणी सभापती निमेश नायर यांनी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत घटनास्थळी स्वत ठाण मांडले होते. त्यांनी महावितरण आणि न.प.च्या कर्मचाऱयांना आवश्यक सूचना दिल्या. कर्मचाऱ्यानी तब्बल 7 तास युद्धपातळीवर काम करून झाड हटवले आणि वीजपुरवठा सुरळीत केला.

शहरालगतच्या परवटवणेकडे जाणाऱ्या परिसरात मिऱ्या-नागपूर महामार्गो काम अर्धवट स्थितीत असल्याने पावसाच्या पाण्यासोबत प्रचंड चिखल खालचा फगरवठार परिसरात घुसला. शहरातील खालचा फगरवठार येथील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात चिखल वाहून आला. रस्त्याच्या कामामुळे या परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने नागरिकांचे हाल झाले. या गंभीर परिस्थितीत स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांचे फोन उचलणे टाळल्यामुळे संतप्त नागरिकांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधला. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेबद्दल जनतेमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील कर्ला-आंबेशेतकडे जाणाऱ्या जीजीपीएस हायस्कूलच्या मागील रस्त्यावर पहाटेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने वाहतूक एका बाजूने सुरू राहिली. झाडगाव येथे आंब्याचे मोठे झाड मुख्य रस्त्यावर आडवे पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन ते तीन तासांच्या प्रयत्नांनंतर हे झाड बाजूला करण्यात यश आले. मारुती मंदिर स्टेडियममागील भाजी मार्केटजवळ पालिकेने यंदाही गटारे साफ न केल्याने रस्ता आणि गटार एक झाले होते. संपूर्ण परिसरात पाणीच पाणी साचले होते. तसेच शहरातील रामाआळी भागातही पहाटेच्या वेळी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र पाऊस ओसरल्यानंतर येथील पाणी कमी झाले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page