
मुंबई, प्रतिनिधी : सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ अधिक प्रभावी व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशन २०२६-२७ मध्ये विधानसभेत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला.
योजनेअंतर्गत काही ठिकाणी उपचार खर्चाची संपूर्ण माहिती रुग्णांना उपलब्ध होत नसल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. लाभार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक उपचारानंतर रुग्णांना मंजूर पॅकेज व झालेल्या खर्चाचा तपशील लेखी स्वरूपात देण्यात यावा, नियमित लेखापरीक्षण करण्यात यावे, तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करावी तसेच लाभार्थ्यांच्या कार्डातील वापरलेली व शिल्लक रक्कम तात्काळ कळविण्याची प्रभावी व्यवस्था उभारावी, अशा सूचना आमदार निकम यांनी शासनाकडे केल्या.
गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्य हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आरोग्य योजनांमध्ये अधिक पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकांचा विश्वास वाढविण्यासाठी आमदार शेखर निकम यांनी केलेली ही मांडणी सभागृहात विशेष लक्षवेधी ठरली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

