देवरूख परशुरामवाडी धरणाला गळती …

Spread the love

संगमेश्वर  : पाणीटंचाईचा चटका सहन करणाऱ्या देवरूखवासीयांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. ज्या धरणामुळे शहराची तहान भागते, त्या परशुरामवाडी धरणाला मोठी गळती लागली असून, पाणी अडवून ठेवणारा मुख्य बंधाराच कमकुवत झाला आहे. तब्बल २५ वर्षे पावसाळ्यात बाव नदीच्या अक्राळविक्राळ प्रवाहाचा सामना करत उभा असलेला हा बंधारा आता ढासळण्याच्या मार्गावर आहे. जर वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तर देवरूखकरांवर पाणी पाणी करण्याची वेळ येईल, अशी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
     

सन २००५ मध्ये उभारण्यात आलेल्या या परशुरामवाडी धरणाची साठवण क्षमता १०० दलघमी इतकी आहे. इथल्या मुख्य पंप हाऊसमधून आणि धावडेवाडी बंधाऱ्यातून देवरुख शहरातील साडेचार हजार नळ जोडण्यांना पाणी पुरविले जाते .  मात्र २५ वर्षे झाल्याने या धरणाची अवस्था दयनीय झाली आहे. धरणाच्या अगदी मध्य भागातून भूगर्भातून धो-धो पाणी बाहेर पडत असून, पाण्याचा खळखळाट स्पष्ट ऐकू येत आहे. बंधाऱ्याला पडलेली भगदाडे पाहता, हा पाण्याचा साठा कधीही वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, नगरपंचायत प्रशासनाला या गळतीची कल्पना आहे. त्यांनी दुरुस्तीसाठी एका ठेकेदाराला घटनास्थळी नेलेही होते, मात्र या कामाचे गांभीर्य पाहून त्या ठेकेदाराने हे काम आपल्याकडून होणार नाही, असे सांगत हात झटकले आहेत. यामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि हतबलता समोर आली आहे.
     शहरात  नादुरुस्त पाइपलाइन आणि धरणाच्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. केवळ मलमपट्टी न करता, नगरपंचायतीने येथे नवीन भव्य बंधारा बांधावा, अशी मागणी केली जात आहे .

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page