
चिपळूण- मांडकी-पालवण,२० जून २०२६- कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद आणि मार्गदर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.”भविष्यात उज्ज्वल यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतरावर भर न देता कौशल्य विकासावर भर दिला पाहिजे. नोकरीमध्ये ‘स्कोप’ हा पदवीला नसून माणसाच्या कर्तृत्वाला असतो. त्यामुळे नोकरी मिळवण्यासोबतच ती टिकवणे आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असा मोलाचा सल्ला ‘भारती ग्रीन टेक’चे संस्थापक माननीय श्री. विनय पोळ यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने व सत्काराने झाली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तसेच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्पष्ट करत भविष्यात विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा कसा फायदा होईल, याबद्दल सविस्तर माहिती दिली. याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या श्री. विनय पोळ यांनी कृषीच्या विद्यार्थ्यांशी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत संवाद साधला. त्यांनी कृषी क्षेत्रातील नोकरीचे सध्याचे वास्तव मांडतानाच, आगामी काळात या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधींवर प्रकाश टाकला. त्यांच्या अनुभवातील या सल्ल्याने उपस्थित विद्यार्थी भारावून गेले होते.
या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, तसेच जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळसाहेब सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय दोन्ही महाविद्यालयांमधील प्राध्यापक, प्राध्यापिका आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

