
चिपळूण : भारत सरकारच्या जनगणना २०२७ या देशव्यापी मोहिमेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील दळवटणे गावाने उल्लेखनीय कामगिरी करत स्वगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले गाव होण्याचा मान मिळवला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाला गावकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही मोहीम यशस्वी ठरली असून दळवटणे गाव आगामी जनगणनेसाठी आदर्श गाव म्हणून समोर आले आहे.
भारताच्या जनगणना २०२७ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि घरगणनेच्या पूर्वतयारीसाठी १ मे ते १५ मे २०२६ हा कालावधी ‘स्वगणना’ प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आला होता. या कालावधीत नागरिकांनी स्वतःची माहिती प्रशासनाकडे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करायची होती. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेचे नियोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी १ मे रोजी स्वतः स्वगणना करून जिल्ह्यात मोहिमेचा शुभारंभ केला होता.
उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दळवटणे गावाची या विशेष उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. प्रशासनाने गावातील प्रत्येक वाडीत जनजागृती मोहीम राबवत नागरिकांना स्वगणनेचे महत्त्व पटवून दिले. गावातील सर्व ९ वाड्यांमधील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विहित मुदतीत ४२५ कुटुंबांची स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली.
२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १८७१ इतकी होती. मात्र ताज्या स्वगणना आकडेवारीनुसार गावाची अंदाजे लोकसंख्या आता २२६२ पर्यंत पोहोचली आहे. गावातील कुटुंबसंख्या ४२५ इतकी नोंदविण्यात आली आहे. लोकसंख्येत झालेली वाढ, स्थलांतर, बदलती सामाजिक रचना आणि कुटुंबव्यवस्थेतील बदल यांचे अचूक चित्र या स्वगणनेतून समोर आले आहे.
या यशामागे प्रशासनाबरोबरच स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान राहिले. तहसीलदार प्रवीण लोकरे, मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष घरभेटी आणि नोंदणी प्रक्रियेत प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव आणि प्रिया मोरे यांनी सक्रिय भूमिका बजावली.
तसेच मदतनीस म्हणून शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलीस पाटील अमित मोहिते यांनीही गावागावात जाऊन नागरिकांना माहिती देणे, नोंदणी प्रक्रियेत मदत करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करणे अशी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
वाड्यानिहाय आकडेवारीनुसार शेट्येवाडीमध्ये १८, गणेशवाडीमध्ये ५१, बागवाडीमध्ये ६७, रामवाडीमध्ये १८, भुवडवाडीमध्ये ६४, नलावडेवाडीमध्ये १०१, बडदेवाडीमध्ये ३५, राजवाड्यात २२ आणि बौद्धवाडीत ४९ कुटुंबांची स्वगणना प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अशा प्रकारे गावातील सर्व वाड्यांमधील एकूण ४२५ कुटुंबांची नोंदणी १०० टक्के पूर्ण झाली.
दळवटणे गावाने दाखविलेली तत्परता, प्रशासनाशी साधलेला समन्वय आणि लोकसहभाग यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे. ग्रामीण भागात डिजिटल आणि प्रशासकीय प्रक्रियांबाबत जागरूकता वाढत असल्याचे हे सकारात्मक उदाहरण मानले जात आहे. जिल्हा प्रशासनाने गावाच्या या कामगिरीचे कौतुक करत इतर गावांनीही दळवटणेच्या पद्धतीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*