रत्नागिरी-दिवा पॅसेंजर पुन्हा ‘दादर’पर्यंत धावणार?रेल्वेमंत्र्यांच्या लेखी आश्वासनामुळे प्रवाशांच्या आशा पल्लवित,भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश…

Spread the love


*रत्नागिरी-* कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजरचा दादरपर्यंतचा प्रवास पुन्हा सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली होती. यावर रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, गाडी दादरपर्यंत नेण्यासाठी तांत्रिक शक्यता तपासून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे कोकणच्या चाकरमान्यांचा कडाक्याच्या संघर्षाला आता यशाची किनार लाभताना दिसत आहे.

कोरोना काळानंतर ही गाडी सुरू करताना दादर स्थानकावरील बदललेली ऑपरेशन्स आणि प्लॅटफॉर्मची अनुपलब्धता या कारणास्तव मध्य रेल्वेने ही सेवा दिवा स्थानकापर्यंत मर्यादित केली होती. मध्य रेल्वेच्या मते, एकाच रेकवर चालणाऱ्या या गाडीमुळे दादर स्थानकावर ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म सुमारे तासभर अडकून पडतो, ज्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. तसेच ‘गोरखपूर एक्सप्रेस’ सुरू झाल्याने या पॅसेंजरचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला होता. मात्र, आता रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार आवश्यक असणारी ‘विशेष परवानगी’ मिळवण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी थेट रेल्वेमंत्र्यांकडे शब्द टाकला आहे.

कोकणवासीयांची गैरसोय संपणार…

सध्या ही गाडी दिवा स्थानकापर्यंतच धावत असल्याने मुंबईत येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिवा स्थानकावर उतरून प्रचंड गर्दीतून लोकलने प्रवास करावा लागतो. ही कसरत कोकणवासीयांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरत होती. यापूर्वी कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य सचिन वहाळकर आणि इतर लोकप्रतिनिधींनी या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा केला होता. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी रेल्वेने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन हा प्रस्ताव नाकारला होता, मात्र आता प्रदेशाध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे हा तिढा सुटण्याची चिन्हे आहेत.

रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने नवा विश्वास

रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वी मंत्री असताना कोकणातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करून त्यांचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची भूमिका बजावली होती. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांनी नेहमीच आक्रमक आणि विधायक भूमिका घेतली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नात लक्ष घातल्याने प्रवाशांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेमंत्र्यांनी तांत्रिक शक्यता तपासण्याचे लेखी निर्देश दिल्याने, तांत्रिक कारणांची अडवणूक आता दूर होऊन लवकरच ही पॅसेंजर दादरच्या प्लॅटफॉर्मवर दाखल होईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page