
संगमेश्वर/ प्रतिनिधी- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा कोळंबे गुरुकुल वसतिगृह येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेला गावातील महिला व ग्रामस्थ मिळून सुमारे 125 लोक उपस्थित होते.दत्तात्रय खातू गुरुजी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले,
या विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून प्रशासक प्रणय श्री भायनाक सर ( विस्तार अधिकारी )यांनी काम केले. या सभेसाठी माजी सरपंच रघुनाथ पडवळ, माजी उपसरपंच चंद्रकांत भरणकर, माजी सदस्य प्रशांत मुळ्ये, तंटा मुक्ती अध्यक्ष अमोल पाटणे, पोलीस पाटील विनेश टाकळे, माजी तंटा मुक्ती अध्यक्ष कासम मयेर अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचतगट महिला, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासक भयनाक सर यांनी या अभियानाचे प्रास्ताविक थोडक्यात मांडले, तसेच सचिव म्हणून नेमणूक केलेले खापरे गुरुजी यांनी अभियानाची सविस्तर माहिती उपस्थित ग्रामस्थांसमोर मांडली.


यानंतर खातू गुरुजी अमोल पाटणे, चंद्रकांत भरणकर यांनी ग्रामस्थांना विनंती केली की, 31 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या या अभियानात आपल्याकडून जेवढ्या मुद्यांची पूर्तता करता येईल तेवढी करून जास्तीत जास्त गुणांची कमाई आपण आपल्या ग्रामपंचायतीला करून देण्यासाठी प्रयत्न करू. गावकऱ्यांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवून आपल्या गावचे नाव तालुक्यात जिल्ह्यात विभागात तसेच राज्यात आदर्श ठरेल असे प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामसभेत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सभेच्या शेवटी प्रत्येक वाडीची कमिटी तयार करून, या कमिटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचून लोकांचा जास्तीत जास्त सहभाग या अभियानात वाढवावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. उपस्थित सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर