
हा काँजवे अजून किती बळी घेणार? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
*साखरपा-* संगमेश्वर तालुक्यातील तिवरे तर्फे देवळेतील तरूण काजळी नदीवरील काँजवेवरून चालत जात असताना पाण्यातून वाहून गेल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यानंतर शोधमोहिमेदरम्यान त्याचा मृतदेह मिळून आला आहे. दिपक अंकुश गोरूले (वय-३९) असे वाहून गेलेल्या मृत तरूणाचे नाव आहे. गेले दोन दिवस साखरपा परिसरात मुसळधार पाऊस पडत असून काजळी नदीवरील काँजवेवरून नदीचे पाणी वाहत आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरूण वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, हा काँजवे अजून किती बळी घेणार? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिपक गोरूले हा तरूण साखरपा येथे कामानिमित्त गेला होता. काम आटोपून तो सायंकाळी घरी परतत असताना कोंडगाव नजीक असणाऱ्या काजळी नदीवरील काँजवेवरून चालत जात होता. याचवेळी काँजवेवरून वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडून तो वाहून गेला. दिपक हा वाहून गेल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी दिपकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रदीप रामाने, शशिकांत गोरुले, वैभव कांबळे आणि ग्रामस्थांनी मिळून वाहून गेलेल्या दीपक गोरुले याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. यानंतर मृतदेह साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दरम्यान, गतवर्षी याच काँजवेवरून पाण्यात पडून वृध्द वाहून गेल्याची घटना घडली होती. तर दोन वर्षांपूर्वी दोन मुली वाहून जाता जाता बचावल्या होत्या.
काजळी नदीचे पात्र रूंद आहे. तसेच पावसाळ्यात तर काजळी नदी दुथडी भरून वाहत असते. मात्र कोंडगाव नजीक या काजळी नदीवर बांधण्यात आलेला काँजवे हा उंचीने कमी असून पाणी जाण्यासाठी बसवण्यात आलेले पाईप हे रूंदीला कमी असल्यामुळे नदीला पूर आल्यास पाणी सहज वाहून जात नाही. परिणामी काँजवेवरून मोठया प्रमाणात पाणी वाहून जाते. तिवरे तर्फे देवळेतील ग्रामस्थ जवळचा व पर्यायी मार्ग म्हणून काँजवेवरून येजा करीत असतात. परंतु पावसाळ्यात काहीवेळा ग्रामस्थांना काँजवेवरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे याठिकाणी मोठा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. पूल झाल्यास ग्रामस्थांचे होणारे हाल कमी होतील. व ग्रामस्थांसह शाळकरी मुलांची मोठी सोय होईल, त्यामुळे याचा विचार करून पावसाळा संपताच याठिकाणी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.