
मुंबई : कोकण परिसरावर सध्या सक्रिय असलेल्या मान्सूनच्या प्रभावामुळे आज १९ जून २०२५ रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर राहणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या भागांमध्ये दक्षतेचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
संपूर्ण कोकण विभागात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता आहे. डोंगराळ व सखल भागात दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासन सज्ज आहे. कोकणात कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २५ – २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. समुद्र खवळलेला राहणार आहे .
आज, गुरुवारी सकाळी ८:३० पासून पुढील २४ तासांत या भागांत ढगाळ वातावरण, गडगडाटी पाऊस, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ४० – ५० किमी प्रति तासापर्यंत जाण्याचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर दिवसभर कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभआगाने २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळी व दुपारी जोरदार सरींसह काही भागांत पाणी साचण्याची स्थिती उद्भवू शकते. रेल्वे व रस्ते वाहतुकीवर त्याच परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी गरजेपुरतीच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे.
नवी मुंबईतही पावसाचा जोर कायम राहणार असून, तापमान २५ ते २८ अंश दरम्यान राहील. ठाणे जिल्ह्यात दिवसभर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३० अंश आणि किमान २८ अंश इतकं राहू शकतं. पालघरमध्ये काही भागांत जोरदार पावसासोबत विजांचा कडकडाट व वादळी वारे येण्याची शक्यता असून, तापमान २६ ते २८ अंशांच्या दरम्यान राहील.
भरती-ओहोटीची परिस्थिती
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२५ रोजी दुपारी ४:५७ वाजता भरती येण्याची शक्यता आहे आणि त्याची उंची ४.०२ मीटर असेल. याशिवाय, कमी भरती येण्याची वेळ रात्री ११:३२ वाजता असेल आणि त्याची उंची १.६१ मीटर असेल. या भरतीचा परिणाम किनारी भागात जाणवेल, त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
यासोबतच १९ जून २०२५ रोजी भरती-ओहोटीचा अंदाजही जारी करण्यात आला आहे. १९ जून रोजी सकाळी ५:४७ वाजता भरती-ओहोटीची उंची ३.३८ मीटर असेल आणि ११:२१ वाजता कमी भरती-ओहोटीची उंची १.८७ मीटर असेल.
वाहतूक आणि सुरक्षितता सल्ला
हवामानाच्या परिस्थिती लक्षात घेता बीएमसीने सर्व नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांनी भरतीच्या वेळी घराबाहेर पडू नये. मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे देखील होऊ शकतात, त्यामुळे वाहनचालकांनाही हळूहळू वाहन चालवण्याचा आणि पाणी साचलेल्या भागात जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पाऊस आणि भरती-ओहोटीच्या परिस्थिती लक्षात घेता सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याचेही बीएमसीने स्पष्ट केले आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना बीएमसीच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.