
रत्नागिरी : तालुक्यामधील हरचेरी- बौद्धवाडी येथे शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे रविवारी सकाळी भूस्खलन झाले आहे.
धीरज अनंत पवार यांच्या काजू बागेमधील जमीन सरकून गावातील मांडवकर वाडीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला. हरचेरी- बौद्धवाडीमध्ये पावसाळ्यात जमीन सरकण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वारंवार घडत आहेत. धीरज पवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार याबाबत लेखी निवेदनेही दिली आहेत. त्यानुसार हरचेरी-बौद्धवाडी येथील धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशी मागणी केली आहे; परंतु, त्यांच्या या मागणीकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचा परिणाम पावसाळ्यात वारंवार पाहायला मिळत आहे.
हरचेरी-बौद्धवाडी येथील धोकादायक डोंगराळ जमिनीची जिल्हा प्रशासनाने तातडीने पाहणी करून येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलावीत . हरचेरी-बौद्धवाडी येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका पोहोचल्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.