
५७ आयुर्वेदिक वृक्षांची लागवड; सुभाषराव चव्हाण यांचे पर्यावरण विषयक मार्गदर्शन
*चिपळूण-* तुम्हाला मायेची ऊब हवी असेल तर प्रत्येक भारतीयाने आपल्या आईच्या नावे एक वृक्ष लावावा आणि त्याचे संगोपन करावे, असे आवाहन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी केले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज असून, ‘एक पेड मेरी माँ के नाम’ या संकल्पनेतून सकारात्मक परिवर्तन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपळीखुर्द येथील श्री केदारसुकाई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था, वाशिष्ठी डेअरी, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, व अन्य सहकारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात कदंब, अर्जुन, वड, पिंपळ, कडुलिंब, आंबा, काजू, जांभुळ, चिंच, आवळा अशा ५७ प्रकारच्या औषधी व फलद्रुप झाडांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी बोलताना सुभाषराव चव्हाण म्हणाले, “केंद्र शासनाने १४० कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी १४० कोटी जनतेच्या खांद्यावर सोपवली आहे. आपण आईच्या नावाने एक झाड लावले तर ती सावली भविष्यात आपल्या पिढ्यांना लाभेल.
कार्यक्रमाला वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीचे व्हाईस चेअरमन अशोक साबळे, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, जिल्हा निबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सौ. प्रियांका माने, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, पिंपळीखुर्द सरपंच अंजली जांबुर्गे, तसेच विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे समन्वयन व आयोजन चिपळूण नागरीचे अधिकारी व वाशिष्ठी डेअरीचे कर्मचारी यांनी सौ. स्वप्ना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडले.