
रत्नागिरी: कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय माणसाचे आयुष्य कसे बदलू शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांचा जीवनप्रवास. एकेकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर भाजी विकणारे नितीन, त्याच कार्यालयात आयपीएस अधिकारी म्हणून रुजू होतील याची कोणी कल्पनाही केली नव्हती. त्यांची ही हृदयस्पर्शी कहाणी अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे.
खडतर बालपण आणि संघर्षाचा प्रवास…
नितीन बगाटे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा गावचे रहिवासी आहेत. अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेले नितीन, कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शहराच्या एसपी कार्यालयाजवळ भाजी विकत होते. याच काळात त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेल्या यूपीएससी (UPSC) नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. अनेक आव्हाने आणि अडचणींवर मात करत नितीन यांनी स्वतः सोबतच आपल्या कुटुंबाचे स्वप्न साकार केले.
अनेक अपयशानंतर गवसले यश
यूपीएससीच्या तयारीदरम्यान नितीन यांना अनेकदा अपयश आले. अनेक वर्षे मेहनत करूनही ते तीन वेळा मुलाखतीपर्यंत पोहोचूनही त्यांना यश मिळाले नाही. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अपयशातून धडा घेत त्यांनी आपली तयारी सुरूच ठेवली आणि अखेर २०१६ मध्ये त्यांनी यश खेचून आणत आयपीएस (IPS) पद मिळवले.
सध्या नितीन बगाटे छत्रपती संभाजीनगर येथे उपायुक्त (DSP) पदावर कार्यरत होते. आता त्यांची रत्नागिरी पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची कहाणी अनेक तरुणांना प्रेरणा देते की, स्वप्न कितीही मोठी आणि आव्हानांनी भरलेली असली तरी कठोर मेहनत आणि दृढनिश्चयाने ती साकार केली जाऊ शकतात. संभाजीनगरचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली होण्यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणूनही काम केले आहे.
सप्टेंबर २०२३ पासून ते संभाजीनगरमध्ये डीएसपी आहेत. आयपीएस अधिकारी बनल्यानंतर २०१८ ते २०२० या काळात ते परभणी येथे प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तसेच सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नितीन बगाटे यांची ‘दबंग अधिकारी’ म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग येथे आपली सेवा दिली आहे.