
रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या विणीच्या हंगामात १५३ घरट्यांच्या माध्यमातून १५ हजार ४४४ अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. आतापर्यंत ४ हजार ६३२ पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत.
ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीला रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनारा अंडी घालण्यास सुरक्षित वाटू लागल्यामुळे दरवर्षी या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अंडी घातली जातात आणि ती संरक्षित करण्याचे काम प्राणिमित्र आणि वनविभागाने केले आहे. यावर्षी या किनाऱ्यावर आतापर्यंत १५३ घरटी तयार झाली असून, त्या माध्यमातून १५ हजार ४४४ अंड्यांचे संरक्षण करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यानंतर दररोज तयार झालेली पिल्ले समुद्रात सोडली जात आहेत. यासंदर्भात वनाधिकारी साबणे म्हणाले, या गावखडी किनाऱ्यावर कासवांच्या अंड्यांचे संवर्धन केले जात आहे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्राणिमित्र आणि वनविभागाने घेतली आहे.