
संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी १ आणि २ मे रोजी कामबंद आंदोलन करणार असल्याचे ग्रामपंचायत कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा होडे यांनी जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मिळावी, निवृत्ती वेतन लागू करावे, ग्रॅज्युएटी मिळावी, सुधारित किमान वेतन लवकरात लवकर मिळण्याची व्यवस्था करावी. वसुलीची व उत्पन्नाची अट शासन निर्णयानुसार सरपंच, कार्यकारी मंडळ, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांवर आहे. अंमलबजावणी मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर लादली जात आहे. वेतनासाठी लादलेली वसुलीची व उत्पन्नाची अट तत्काळ रद्द करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना देण्यात आले आहे. या सर्व मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून बऱ्याचवेळा मोर्चे, आंदोलन, मेळावे, अधिवेशन आणि मंत्र्यांच्या भेटीसुद्धा झाल्या. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.