
खेड :- गोव्यामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या अमरावतीमधील पर्यटकांची ट्रॅव्हलर गाडी खेडनजीक मुंबई-गोवा महामार्गाच्या कठड्याला धडकून दहा प्रवासी जखमी झाले. त्यातील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना मुंबईला हलवण्यात आले आहे. बुधवारी, दि. ३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चालक शैलेश संपत बिरामणे (३२, रा. मुंबई) हा ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ६९०१) घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. त्यावेळी ट्रॅव्हलरमध्ये संगीता नितीन रायचुरा (५४), अंजली सतीश सबसुळे (५२), संगीता ओमप्रकाश गोंधळे (४७), देवांशी जितेंद्र ठाकूर (१२), चेतना बाबालाल ठाकूर (४३), नितीन रायचुरा (५६), जितेंद्र लालसिंग ठाकूर (४४), सतीश विठ्ठलराव सबसुळे (५८), ओमप्रकाश गंगाराम गोंधळे (६०, सर्व रा. अमरावती) हे प्रवासी होते. हे प्रवासी प्रथम मुंबईमध्ये आले. तेथून ते गोव्याला गेले. बुधवारी ते मुंबईच्या दिशेने परत निघाले असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील तुळशी ते खवटी गावांदरम्यान चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व क्षणार्धात चारपदरी रस्त्यामधील दुभाजक ओलांडून ट्रॅव्हलर पलीकडच्या बाजूला जाऊन कठड्यावर धडकली. या अपघातात चालकासह दहा जण जखमी झाले. जखमींपैकी आठ जणांना डोके, हात, पाय, छातीला गंभीर दुखापत झाली असून,त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.