देवरुख / डिसेंबर २२, २०२३- भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, देवरुख नगर परिषदेचे माजी स्वीकृत नगरसेवक यशवंत गोपाळ यांच्या कामाचा आवाका पाहून त्यांची नियुक्ती भाजपा भटक्या-विमुक्त जाती मोर्चा, रत्नागिरी (द.) च्या जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. संगमेश्वर (द.) तालुक्याचे सरचिटणीस म्हणून ते यापूर्वी काम पहात होते.
‘मन की बात’ प्रकोष्ठ, संगमेश्वर (द.) च्या संयोजकपदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. याबाबत त्यांनी जिल्ह्यात सातत्याने आपल्या मंडलाला क्रमांक १ वर ठेवले. सोबतच पक्षाच्या अन्य उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते सातत्याने मेहनत घेत आहेत. याच सेवा कार्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी त्यांची दखल घेत लोकसभा २०२४ निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यातील सर्व भटक्या-विमुक्त बांधवांचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना दिली आहे. आज जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत संगमेश्वर दौऱ्यावर आले असताना त्यांनी ही घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. तसेच चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान केले.
यावेळी आपल्या मनोगतात श्री. गोपाळ म्हणाले, “भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असामान्य पक्ष आहे. आज मला भटक्या-विमुक्त बांधवांचे नेतृत्व करण्याची संधी देऊन मा. जिल्हाध्यक्षांच्या हस्ते माझा सन्मानच झाला आहे. याबद्दल मी निवडकर्त्यांचा मनस्वी ऋणी आहे. माझ्यावर ठेवलेला हा विश्वास यापुढेही माझ्या कामातून सार्थ ठरवेन असे मी सर्वांच्या साक्षीने वचन देतो.” भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (द.) जिल्हा तसेच संगमेश्वर (द.) तालुक्यातील विविध मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सर्वांनी श्री. यशवंत गोपाळ यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.