
खालापूर :- रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ७५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, एकूण ४८ कुटुंब इथं आहेत. सुमारे ७५ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून ५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीनं उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील १५ ते १७ घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक बचाव दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.