
रत्नागिरी : उत्तर कोकणात पावसाचा जोर सकाळपासून कायम असून रायगड जिल्ह्यातील दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथील जगबुडी मध्ये इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पुराआधीच चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF )टीम दाखल झाल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड, पोलादपूर व महाड ही तिन्ही शहरे पुन्हा पुराच्या छायेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाड, पोलादपूर तालुक्यातील व खेड तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.