
बीड – ऊसतोडीच्या उचलीचे पैसे बाकी राहिल्याचा दावा करत, चक्क ऊसतोड कामगाराच्या 6 चिमुकल्या मुलांनाच ऊसतोड मुकादमाने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरच्या कुंभेज येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. करमाळा पोलिस अन बालकल्याण समितीच्या मदतीने सहा चिमुकल्या मुलांची सुटका करण्यात आली आहे.
बीडच्या केज तालुक्यातील शिंदी गावातील ऊसतोड मजूर कुटुंब व गेवराई तालुक्यातील दोन कुटुंबे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. ऊसतोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर करमाळा येथील एका ऊसतोड मुकादमाने, मजुरांकडे पैसे शिल्लक असल्याचे म्हणत आणखी तीन महिने काम करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार ऊसतोड मजुरांनी तीन महिने काम केले. मात्र अद्यापही पैसे शिल्लक असल्याचा दावा मुकादमाने केला. पैसे द्या; अन्यथा तुमची मुले आमच्याकडे ठेवा, असे सांगत ऊसतोड मुकादमाने 3 मुले व 3 मुली करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे डांबून ठेवल्या.
या दरम्यान शांताबाई वसंत माळी यांनी सोलापूर येथील चाइल्ड लाइनला मुले डांबून ठेवल्याची माहिती दिली. त्यावरून चाइल्ड लाइनने ही माहिती सोलापूरच्या बाल कल्याण समितीला कळवली. समितीने करमाळा पोलिसांना याची माहिती देत त्या बालकांची सुटका करण्याचे आदेशित केले. पोलिसांनी या चिमुकल्या बालकांची सुटका करून सोलापूर बाल कल्याण समितीपुढे सादर केले. तेथून केजच्या अमर पाटील यांनी त्या मुलांना बालकल्याण समितीच्या मदतीने बीडमध्ये आणले. बालकल्याण समितीने त्या 6 चिमुकल्या बालकांना आई- वडिलांकडे सुपुर्द केले आहे.