
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवर आपलं नशीब आजमावलं आहे. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांच होस्टिंग या कलाकारांनी केलं आहे. यामध्ये कपिल शर्मा, कंगना रणौत, करण जोहर, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. चित्रपटासारखेच टेलिव्हिजनवरील या कार्यक्रमाच्या एका भागासाठी हे कलाकार लाखो रुपये आकारतात. मात्र, टेलिव्हिजनवरील मानधनाच्या बाबतीत सलमान खानने या सगळ्या कलाकारांना मागं टाकलं आहे. सलमान खान भारतातील सर्वात महागडा टीव्ही स्टार ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा (द कपिल शर्मा शो), कंगना रणौत (लॉक अप), करण जोहर (कॉफी विथ करण) अमिताभ बच्चन (कौन बनेगा करोडपती) यांनी आपला शो होस्ट करण्यासाठी एका भागासाठी एक कोटी रुपये मानधन घेतले होते. मात्र, सलमान खानने मानधनाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षी सलमान खानने ‘बिग बॉस १६’ साठी एकूण १ हजार करोड रुपये इतके मानधन आकारलं होतं. सलमानने एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होते. ‘सियासत’ आणि ‘टेलिचक्कर’च्या अहवालात सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’चे सूत्रसंचालन करण्यासाठी एका आठवड्याला २५ करोड घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एका भागासाठी हे मानधन जवळ जवळ १२.५० कोटी रुपये इतके जातं. या रकमेनंतर सलमान टेलिव्हिजनवर सर्वात जास्त ‘पर-डे’ घेणारा अभिनेता ठरला आहे.