
रेल्वेच्या भीषण अपघातात त्याने आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला,उरलेल्या एका हाताची दोन बोट तुटली, त्याचा एक भीषण अपघातनघडला अन् क्षणात सर्व गोष्टी बदलल्या. मात्र,तो खंबीर होता. घडलेल्या प्रकाराने आतून त्याला पेटवलं होतं. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्या अपघातातून त्याने स्वत:ला सावरलं.घराच्यांनी आपल्यावर अवलंबून राहायच्या वयात आपण त्यांच्यावर अवलंबून राहतोय ही गोष्ट त्याला सलत होती.या अपघातानंतर व्हिलचेअरच्या साहाय्याने तो हालचाली करत होता. उरलेल्या तीन बोटांच्या मदतीने लिहू लागला होता. अखेर त्याने आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलं आणि आज त्याने यशाला गवसणी घातलेय.
मी सांगतोय ती गोष्ट आहे…नुकत्याच पार पडलेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत घवघवती यश प्राप्त करणाऱ्या सूरज तिवारीची..कोणीतरी बरोबरच म्हटलंय.जो मेहनत करतो त्याचा कधीच पराभव होत नाही. तुमची परिस्थिती
कशीही असो, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तुमच्यात जिद्द असेल, तर
जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकत नाही आणि हे सुरजने खरं करून दाखवलंय.
मैनपुरी येथील रहिवासी असलेल्या सूरज तिवारीने नेत्रदिपक कामगिरी करत UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत देशात ९१७ वा रँक मिळवलाय. सूरजने घडलेली वाईट घटना विसरून देशातील सर्वात कठीण UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केलीये. मंगळवारी २३ मेला केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल जाहीर केला आणि त्यामध्ये सुरजने उत्तीर्ण होत घराच्यांचा विश्वास जिंकला.