
मुंबई- राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या दहा महिन्यांच्या या तणावाच्या परिस्थितीतून मुक्तता मिळाल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा मंत्रिमंडळ विस्ताराकडे वळवला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, आता सर्वात प्रथम प्राथमिकता म्हणजे पक्षविस्तार. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना माझ्या संपर्कात केवळ ठाकरे गटाचेच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही अनेक नेते होते पण त्यांना निकालाची धास्ती होती. आता ही धास्ती दूर झाली आहे. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर गेल्या दहा महिन्यांच्या तणावाबाबत ते म्हणाले, ‘तणाव तर होताच पण माझे ४० आमदार सतत बरोबर आहेत, हा प्रचंड विश्वास होता आणि त्याच बळावर हा ताण सुसाह्य झाला.
ज्या विश्वासाने या ४० जणांनी माझ्याबरोबर मुंबई ते गुवाहाटी प्रवास केला ते बळ माझ्याबरोबर होतं. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून असलेली जबाबदारी आणि त्याच वेळी रोज नवे आव्हान होते. मंत्रिमंडळ विस्तार आता लवकरच होईल. पावसाळी अधिवेशनाच्या आधी तर नक्कीच. आता आमच्याकडे कोणी नाराज राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सोबतच्या पक्षांना वाढू द्यायचे नाही हा भाजपचा लौकीक आहे, असे विचारता ते म्हणाले की आमच्यात चांगला समन्वय आहे. असा कोणताही प्रकार माझ्या निदर्शनास आलेला नाही, आम्ही आमचा पक्ष वाढवण्यास समर्थ आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.