भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 9 जणांचा मृत्यू:4 ते 5 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू…

Spread the love

*भिवंडी-* भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, 4 ते 5 जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे.

अडथळे पार करत बचावकार्य…

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक चाळ जेसीबीच्या साहाय्याने तोडून बचाव पथकाने आत प्रवेश मिळवला.

दोषींवर कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश…

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

गिरीश महाजनांकडून घटनास्थळाचा आढावा; मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतीचे आश्वासन..

भिवंडीतील इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. या इमारतीबाबत प्रशासनाने आधीच धोकादायक असल्याची पूर्वकल्पना देत दोन वेळा नोटीस बजावली होती आणि येथील सर्व ३० कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते; मात्र, दुर्दैवाने काही जण पुन्हा आत गेल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला, अशी माहिती महाजन यांनी दिली. अद्यापही ढिगाऱ्याखाली एनडीआरएफकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, दुर्घटनेमुळे शेजारील दुसरी इमारतही खचल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तीदेखील तातडीने रिकामी केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे.

राज्यभरातील धोकादायक इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करा- विजय वडेट्टिवार…

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत नऊ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारच्या कारभारावर विजय वडेट्टिवार टीका केली आहे. ही केवळ दुर्घटना नसून ढिसाळ प्रशासन, अनधिकृत बांधकामांना मिळणारे संरक्षण आणि भ्रष्ट व्यवस्थेचे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धोकादायक व अनधिकृत इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी वडेट्टिवार यांनी केली आहे.

रिकामी केलेली इमारत अन् जीवघेणा मोह…

दुर्घटनाग्रस्त झालेल्या या इमारतीचे नाव कोहिनूर अपार्टमेंट असून ती 2012 मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, बांधकाम कमकुवत असल्याने तिला महापालिकेने आधीच धोकादायक म्हणून जाहीर केले होते. गुरुवारी या इमारतीच्या एका विंगमधील तळमजल्यावरील खराब झालेल्या पिलरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यादरम्यान इमारतीला तडे जाऊ लागले आणि रात्री 8 वाजेच्या सुमारास इमारत एका बाजूला कललेली दिसली.

धोका ओळखून महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी कर्मचाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीस बंदोबस्तात पूर्ण इमारत रिकामी केली. तसेच, इमारतीचे वीज आणि पाणी कनेक्शनही तोडण्यात आले. मात्र, दुर्दैवाने काही रहिवासी घरातील आपले साहित्य काढण्यासाठी पुन्हा तळमजल्यावर गेले आणि बरोबर साडेअकराच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग त्यांच्या अंगावर कोसळला.

५ ते ६ जण अडकल्याची भीती…

एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर ढिगारा उपसण्याचे काम केले असून आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली 4 ते 5 जण अडकलेले असण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

चाळीसगावातील 100 वर्षे जुना पालिका भवनाचा भाग कोसळला…

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या नगरपालिकेच्या इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित इमारतीत प्रशासकीय कामकाज होत नसून स्वच्छता व पालिकेचे साहित्य ठेवण्यासाठी तिचा वापर केला जात असल्याने मोठी दुर्घटना टळली.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page