![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/FB_IMG_1696385268804.jpg)
दापोली :- तालुक्यातील केळशी येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे १८ घरांचे सुमारे २० लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
दापोली तालुक्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला. त्यात केळशीत येथे गेल्या अनेक वर्षात जेवढा पाऊस पडला नव्हता तेवढा एका दिवसात पडला. केळशीतील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. दिवसभरात समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे भारजा नदीतील पाण्याला जाण्यास मार्ग नसल्याने केळशी गावात पाणी भरल्याची माहिती नागरिकांनी दिली. पाऊस थांबल्यावर हे सर्व पाणी ओसरल्याने तेथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला . केळशी येथे पाणी भरल्याने १८ घरातील अन्नधान्य, कपडे, घरे यांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान कुंभारवाडा व नवानगर या भागात झाले आहे.
महसूल विभागाचे तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला असून, या संदर्भातील अहवाल तहसीलदारांना सादर केला आहे. यात नरेश तळदेवकर यांचे १७ हजार ३४०, सचिन तळदेवकर १२ हजार १०, भागिर्थी पालशेतकर ७ हजार ३८०, नंदकुमार खेडेकर ३७ हजार ९५०, सुलोचना तळदेवकर १४ हजार ५००, नीलेश तळदेवकर १ हजार ५००, विद्याधर तळदेवकर १० हजार, अनंत तळदेवकर १२ हजार, नीलेश जैन ३६ हजार, प्रकाश सोनवलकर २ हजार ५००, लक्ष्मी कुडेकर ७ हजार ४६०, दिलीप तळदेवकर ३३ हजार ७५०, मिनाक्षी दाभोळकर १८ हजार १४०, अमित तळदेवकर १८ हजार २१०, इंदिराबाई खेडेकर ९ हजार २५० रु. इतके नुकसान झाले आहे.
केळशी गाव अंतर्भूत असलेल्या आंजर्ले महसूल मंडळात रविवारी (ता.१) तब्बल २१६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असून दापोली (८५), बुरोंडी (१८९), दाभोळ (८४), वाकवली (८१), पालगड (१०६), वेळवी (७५) अशी ७ मंडळात पावसाची नोंद झाली आहे.