अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टिकोनातून वार्तांकन करावे – जितेंद्र दीक्षित…

Spread the love

रत्नागिरी :- एखादा संघर्ष झाल्यास लोकांना जागृत करणे आपले काम आहे. अशा वेळी अधिकृत माहिती घेवून मानवी दृष्टीकोनातून जबाबदारीने वार्तांकन करावे, असे मार्गदर्शन एनडीटीव्हीचे वृत्त संपादक जितेंद्र दीक्षित यांनी केले.

विभागीय कोकण माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कोकण विभागातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेत युध्दजन्य परिस्थितीतील पत्रकारिता या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.  यावेळी माहिती संचालक हेमराज बागुल उपस्थित होते.


संगणकीय सादरीकरण करत श्री. दीक्षित म्हणाले, वार्तांकनाच्या माध्यमातून संघर्षाचे कारण माहिती करून घेणे आवश्यक आहे. संघर्षात आपण बाधित लोकांचा आवाज आहोत. संघर्षाच्या काळात अफवा पसरण्यापासून थांबविणे ही आपली जबाबदारी आहे. या कारणांमुळे संघर्ष क्षेत्रातील पत्रकारिता महत्त्वाची आहे. संघर्ष क्षेत्रात जाण्यापूर्वी योग्य संशोधन करणे महत्त्वाचे असून, त्यामुळे प्रभावी वार्तांकन करता येऊ शकते. संघर्ष क्षेत्रात पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वार्तांकन करण्यास मदत होते.

संघर्ष क्षेत्रात जाताना आपल्या सोबत ओळखपत्र, जॅकेट, हेल्मेट, प्रथमोपचार पेटी, पावर बॅंक, पेन किलर आणि खाण्याचे काही सामान असावे. तेथे जाण्यापूर्वी तेथे आपली ओळखीची व्यक्ती आहे का, हे तपासून तेथील स्थिती जाणून घ्यावी. जे पात्र असेल त्यांनी डिफेन्स करस्पॉन्डंट कोर्स पूर्ण करावा. तेथील रिस्क असेसमेंट करावी, लोकांशी बोलावे. वार्तांकन करताना तुमची पोझिशनिंग निश्चित व सुरक्षित ठिकाणी असावे. पत्रकार म्हणून आपली ओळख स्पष्ट होईल, असे राहावे. एक्झिट प्लॅन तयार ठेवावा. स्थानिकांनी दिलेली माहिती दुर्लक्षित करू नये. टीमवर्क म्हणून काम करावे. अशा परिस्थितीत वैयक्तिक फायदा पाहू नये. नैतिक वार्तांकन करावे.

बातमीत तथ्यात्मकता असावी. बातमी देताना संवेदनशीलता बाळगावी व निष्पक्ष रहावे. अशा परिस्थितीत फिजिकल डेंजर, सेन्सरशिप, चुकीची माहिती, इमोशनल टोल ही आव्हाने आहेत. वार्तांकन करताना अथवा केल्यानंतरच्या भावनात्मक धक्क्यातून सावरणे देखील गरजेचे आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना संघर्षाची माहिती प्रभावीपणे द्यावी, असे सांगून श्री. दीक्षित यांनी संघर्ष परिस्थितीत वार्तांकन करतानाचे त्यांचे अनुभव कथन केले.
    

यावेळी प्र उपसंचालक अर्चना शंभरकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page