ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे,गावागावात गुलाल उधळणार; 2,359 ग्रामपंचायतींसाठी मतदानाची तारीख ठरली!

Spread the love

मुंबई- राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान (Voting) होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

मदान यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

https://x.com/MahaDGIPR/status/1709214259765473486?s=20

मतदान आणि मतमोजणी कधी?

5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागाच 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल.

पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका का रखडल्या?

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मात्र, त्यापूर्वी 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यामुळे अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली.

त्याच प्रमाणे, मविआ काळात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना बदलण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता. या नव्या वॉर्ड रचनेलाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं. पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे? हे या निवडणुकांमधून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे, पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. देशपातळीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपच्या गोटात दररोज बैठकांचं सत्र सुरु आहे. विरोधी पक्षाच्या आघाडीनेही भाजपविरोधात कंबर कसली आहे, त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page