मृग नक्षत्रापूर्वीच दुर्मीळ मृगकीटकांचे आगमन,निसर्गाचे कालचक्र बदलतेय; १६ दिवस आधीच पाऊस…

Spread the love

*दीपक भोसले/संगमेश्वर –* रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर कोकणातील निसर्गसौंदर्य अधिकच बहरले आहे. अशातच मृग नक्षत्राच्या आगमनाची चाहूल देणाऱ्या दुर्मीळ मृगकीटकांचे दर्शन यंदा मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या कीटकांचे शेतातून आगमन झाले आहे. मृग नक्षत्र साधारणतः जूनच्या सात तारखेच्या आसपास सुरू होते आणि त्याचवेळी जमिनीवर ठिकठिकाणी हे अष्टपाद मृग कीटक दिसू लागतात आणि निसर्गसौंदर्यात दुर्मीळ मृगकीटकांची भर पडते. लाल रंगाचे आणि मखमली पाठीचे हे कीटक दिसायला अत्यंत आकर्षक असतात. या कीटकांचे दर्शन झाल्यावर शेतकऱ्यांना मृग नक्षत्राच्या आगमनाची खात्री पटते. हे कीटक जमिनीतून कसे येतात आणि नेमके मृग नक्षत्रातच का दिसतात याबाबत लोकांमध्ये मोठे कुतूहल आहे. मान्सूनमुळे कोकणातील निसर्गसौंदर्याला या दुर्मीळ मृगकीटकांच्या दर्शनामुळे आणखीच शोभा आली आहे.

दरम्यान, यंदा नैऋत्य मॉन्सून २६ मे रोजी मुंबईत दाखल झाला आहे, जो सामान्यतः
११ जून रोजी दाखल होतो. यामुळे मान्सून सामान्य तारखेपेक्षा दोन आठवड्यांहून अधिक काळ आधी पुणे-मुंबईत दाखल झाला आहे.

पुण्यात मॉन्सून साधारणतः १० जूनला दाखल होतो; मात्र यंदा १२ दिवसांआधीच तो पुण्यात पोहोचला आहे. मुंबईत मॉन्सून नेहमीपेक्षा १६ दिवस आधी दाखल झाला असून, २००१-२५ या कालावधीत यंदा मुंबईत मॉन्सून सर्वात आधी दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यावरून एकूणच निसर्गाचे कालचक्र बदलत असल्याची चुणूक पाहायला मिळते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page