माखजन ,करजुवे खाडीत वाळू चोरांचा हैदोस,जनता मात्र धोक्यात :सुरेश भायजे…

Spread the love

गौरव पोंक्षे/माखजन- संगमेश्वर तालुक्यातील माखजन करजुवे खाडीत सध्या वाळूची बेकायदा लूट सुरू असूनही यापूर्वी या परिसरातील स्थानिक लोक वाळू चोरी अल्प प्रमाणात करत होते,आता चिपळूण सह कराड, कोल्हापूर चे वाळू माफिया उतरल्याने गेले चार दिवस दोनशे ते अडीचशे ट्रक ,डंपर च्या सहाय्याने वाळू चोरट्यांनी माखजन विभागात अक्षरशः हैदोस घातला असून येथील निरपराध जनतेचे जीवन मात्र धोक्यात आले आहेत असा आरोप बहुजन विकास आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भायजे यांनी केला आहे.

राजकीय पुढारी, भ्रष्ट प्रशासन यांच्या संगनमताने हा वाळू चोरी व्यवसाय राजरोसपणे चालू असल्याचे भायजे यांचे म्हणणे आहे.

दिवसरात्र ओली वाळू वाहतूक डंपर द्वारे केल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी सांडत असल्याने रस्ता चिखलमय निसरडा बनतो.त्या चिखलमय रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.जरा ब्रेक केला तरी बाईक,रिक्षा घसरून अपघात होतात.यापूर्वी दोन बाईकस्वारांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सकाळी साडेपाच वाजता आरवली रेल्वे स्थानकात तुतारी एक्सप्रेस मधील प्रवासी व साडेसहाला मुंबईला जाणारे दिवा पॅसेंजर मधील प्रवाशांची यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने करजुवे ते माखजन ते आरवली असा प्रवास करणाऱ्यांना निरपराध लोकांना अपघाताचा मोठा फटका बसत आहे.आरवली ते माखजन ते करजुवे या वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याची साइडपट्टी उखडल्याने हे वाळू वाहतूक करणारे मग्रूर,अहंकारी डंपर चालक डांबरीकरणावरून खाली उतरत नाहीत ,अनेक वेळा समोरच्या वाहन चालकाशी हुज्जत घालतात,भानगडी करतात.परिणामी समोरच्या बाईक,रिक्षा व चारचाकी वाहनानं गाडी साइडला घेऊन कसरत करत चालवावी लागते.

माखजन ते करजुवे गडनदी खाडी चे पात्र अरुंद असल्याने सक्सन पंपाने वाळू काढून उर्वरित चाळ चे ढिग नदीपात्रात सोडले जात असल्याने विरुद्ध दिशेचा नदीकाठ पाण्याच्या प्रवाहाने तोडल्याने भातशेती जमीनच नष्ट होत चालली आहे.

या माखजन खाडी परिसरातील पारपरिक मासेमारी हे उत्पन्नाचे साधन होते.मात्र सक्षन पंपाद्वारे साठ- सत्तर फूट खोल खड्डा मारून वाळू काढली जात असल्याने मासेमारी साठी खाडीत उतरलेल्या करजुवे येथील कै.बाचिम तर कासे गावातील कै.जड्यार अशा दोघांचा खड्यात अडकून मृत्यू झाला होता.त्यामुळे या खाडीतील मासेमारी पूर्ण बंद झाली आहे.

अशा प्रकारचे साठ सत्तर फूट बेकायदेशीर उत्खनन करून नदीपात्र उध्वस्त केले जात असेल तर आज ना उद्या निसर्गाचा कोप होणे अटळ आहे.

संगमेश्वर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष डीवायएसपी श्री शिवप्रसाद पारवे यांनी या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत तीन वाळूने भरलेले डंपर जप्त करून रीतसर वाळू चोरीचा,वाहतुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यामुळे दोन दिवस वाळू उत्खनन बंद होते.पारवेसाहेब रजेवर गेल्यामुळे आता पुन्हा आठ दहा दिवस राजरोस वाळू उत्खनन सुरू झाले आहे.

नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या तालुक्यात बेकायदेशीर वाळू उत्खनन चालू असेल त्या भ्रष्ट तहसीलदारावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे जाहिर करण्यात आले होते.मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अनेक तालुक्यातून राजरोसपणे विना परवाना वाळू उत्खनन चालू आहे मात्र शासनाच्या आदेशाप्रमाणे कोणत्याच तहसीलदारावर कारवाई झालेली नाही.

या चोरट्या धंद्यांना वरदहस्त असणारे लोकप्रतिनिधी ही सहभागी आहेत.त्यांच्यावर कारवाई कोण करणार??असा सवाल सुरेश भायजे यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page