![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/1000262714.jpg)
नागपूर- काँग्रेस पक्षात लहान कार्यकर्ता कोणत्याही नेत्याला टोकू शकतो. मी त्यांचं ऐकतो. त्याचा आदर करतो. मी सहमत नसलो तरी ऐकतो. परंतु भाजपमध्ये मात्र गुलामी चालू आहे, अशी घणाघाती टिका काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी आज गुरूवारी नागपूर येथे बोलताना केली.
नागपुरात काँग्रेसचा १३९ व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आज गुरूवारी पार पडला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी भाजपवर सडकून टीका केली. राहुल गांधींनी भाजपवर बेरोजगारी, ओबीसी, हुकूशाही, आरएसएसवरून टिकास्त्र सोडलं. भाजपमध्ये राजेशाही चालते. तेथे गुलामी चालतेय, असा हल्लाबोल राहुल गांधींनी भाजपवर केला. मला एक भाजपचा खासदार भेटला त्यांनी सांगितले कि, ते भाजपमध्ये असूनही त्यांना ते सहन होत नाही. माझं मन काँग्रेसमध्ये आहे. मग मी त्यांना सांगितले की, शरीर भाजपमध्ये आहे, मन काँग्रेसमध्ये आहे, तर आमच्या पक्षात का येत नाहीत. त्यावर उत्तर देताना खासदार म्हणाले भाजपमध्ये गुलामी आहे. वरून आदेश आला तर ते करावं लागतं. आदेश मनाविरुद्ध असला तरी त्याचं पालन करावं लागत असल्याचं ते म्हणाले.
राहुल गांधी पुढे म्हणाले कि, लोक म्हणतात काँग्रेसने काय केलं? स्वातंत्र्यापूर्वी देशामध्ये ५०० ते ६०० राजे होते, इंग्रज होते. देशातील लोकांना कुठलाच अधिकार नव्हता, गरीब व्यक्तीची जमीन आवडली तर राजा घेत होता. ब्रिटिशांच्या काळात काँग्रेस गरीबांसाठी लढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला अधिकार दिले, या देशामध्ये लोकशाही व्यवस्था प्रस्थापित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक संविधानविरोधी आहेत. तिरंग्याला सलामी देत नव्हते, मात्र आपल्याला सर्व अधिकार संविधानाच्या माध्यमातून मिळाले. देशातील जनतेला शक्ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/12/1000262715.webp)
यावेळी राहुल गांधी म्हणाले कि, आज देशात दोन विचारधारांमध्ये लढा सुरू आहे. भाजपची विचारधारा राजेशाही आहे. त्यांच्याकडे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. पण काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, आमच्या पक्षात लोकशाही आहे. आमचा विश्वास आहे की, सत्तेची लगाम देशातील नागरिकांच्या हातात असावी. पण, आज सर्वच संस्थेवर भाजपचा ताबा आहे, अशी टिकाही राहूल गांधींनी केली.