संयुक्त राष्ट्र : युक्रेनमधील युद्ध संपवून रशियाने आपले सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी करणारा गैरबंधनकारक ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने मंजूर केला. भारताने मात्र तटस्थ राहून या ठरावावर मतदान केले नाही. या ठरावाद्वारे युक्रेनमध्ये व्यापक, न्याय्य व चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याची गरज अधोरेखित केली गेली.
या ठरावावर संयुक्त राष्ट्र आमसभेच्या १९३ सदस्य राष्ट्रांपैकी ३२ देशांनी मतदान केले नाही. त्यात भारतही होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत व कायमस्वरुपी शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची सनद (चार्टर) सिद्धांत’ ठराव मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाच्या बाजूने १४१ मते पडली, तर सात मते विरोधात पडली. या युद्धाच्या एक वर्षांनंतरही युक्रेन व रशिया या दोघांनाही मान्य असलेला तोडगा शोधण्यास जगाला यश आले आहे का, असा सवाल मात्र भारताने उपस्थित केला.