![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/1000274181.jpg)
संगमेश्वर तालुक्यातही रात्री अवकाळी पावसाचे जोरदार आगमन; आज मंगळवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण
रत्नागिरी- रत्नागिरी शहर परिसरात मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. संंगमेश्वर तालुक्यातही रात्री अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. आज मंगळवारी सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाले आहे. संंगमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी आज मंगळवारी सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत.
हवामान विभागाने पुढील तीन पावसाचे असल्याचा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज खरा ठरत रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसायला सुरूवात झाली आहे. आज मंगळवारीदेखील सर्वत्र ढगाळ वातावरण असून ढग दाटून आले आहेत. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ सुरू झाली आहे. काहींची बाहेर ठेवलेली जळणाची लाकडे भिजून गेली आहेत. ही लाकडे प्लँस्टीकच्या कागदाने झाकून ठेवण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ होत आहे.
तसेच अवकाळी पावसामुळे आंबा बागांमध्ये नुकतीच फवारणी केलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांची सोमवारी मध्यरात्रीनंतर पडलेल्या पावसाने चिंता वाढवली आहे. अलीकडेच बागांची साफसफाई करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये फवारणीचे टप्पे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्री नंतर (मंगळवारी) कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे केलेले फवारणीचे काय होणार, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. रत्नागिरी शहरात रात्री एक वाजल्यापासून सुरू झालेला अवकाळी पाऊस जवळपास अर्धा एक तास सुरू होता. आज मंगळवारी सकाळपासूनच अवकाळी पावसाने जोरदार आगमन केल्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.