
सुशोभीकरणामुळे कुडाळ रेल्वे स्थानक प्रवासी व पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल — निलेश राणे..




कुडाळ /प्रतिनिधी:-
नारायण राणे राज्याच्या सत्तेत असताना जसा जिल्ह्यासाठी निधी येत होता त्याच पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कालावधीत निधी येत आहे. त्यामुळे २०१४ नंतरचा “बॅकलॉग” चव्हाण यांनी भरून काढला, असे प्रतिपादन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केले. सुशोभीकरणामुळे कुडाळ रेल्वे स्थानक हे प्रवाशी व पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरेल, प्रवाशांना सुद्धा त्याचा निश्चितच फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रेल्वे स्थानक जोडणाऱ्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ श्री. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला.


यावेळी राजू राऊळ, प्रदेश सदस्या सौ संध्या तेरसे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, बाबा परब, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, जिल्हा सदस्य आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, प्रदेश सदस्य बंड्या सावंत, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, युवा मोर्चाचे रुपेश कानडे, पप्प्या तवटे आदी उपस्थित होते.

यावेळी राणे पुढे म्हणाले, कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण व रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी ६ कोटी एवढ्या मोठ्या रक्कमेचा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केली आहे. गेल्या काही वर्षांमधील बॅकलॉग भरून काढण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण करीत आहे. हे कौतुकास्पद असून जिल्ह्यासाठी एवढा निधी आणत असल्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायण राणे जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळी या जिल्ह्यासाठी ज्या प्रकारे निधी येत होता. त्या पद्धतीने सध्या येत आहे. २०१४ नंतर या जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसली होती. मात्र आता मोठ्या प्रमाणावर निधी येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर झपाट्याने विकास होत आहे. कोकणावरही कोणत्याही प्रकारचा अन्याय सरकारने केलेला नाही. कोकणातही मोठ्या प्रमाणावर निधी दिली जात आहे.