
राज्याचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दावोस दौऱ्यावर गेले आहे. मात्र उदय सामंत यांनी तिथे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका केल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
दावोस दौऱ्यावर जाऊन शिवसेना पक्षफोडीवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत भडकले आहेत .
मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकार स्थापन होऊन दोन महिने झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महायुतीचे पालकमंत्री जाहीर झाले आहे. मात्र अनेक जिल्ह्याचे पालकमंत्रिपदावरुन नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. दादा भुसे व भरत गोगावले यांना मंत्रिपद न दिल्यामुळे शिंदे गटात नाराजीनाट्य सुरु आहे. यावरुन आता खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला आहे. हे सर्व अतृप्त आत्मे आहेत, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राज्यातील महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. यापूर्वी जागावाटप, मुख्यमंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अशा सर्वच बाबींवरुन महायुतीमध्ये वादंग निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यांच्या मूळ गावी म्हणजेच दरे गावी गेले असल्याचे बोलले जात आहे. त्या मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि महायुतीमधील नेत्यावंर टीकास्त्र सोडले आहे. तसेच राज्यातील मंत्री दावोस दौऱ्याला गेले असून महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका करत असल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा…
खासदार संजय राऊत म्हणाले की, “यांनी कुठेतरी समाधाना माना, ज्या ईव्हीएमने तुम्हाला एवढा मोठा विजय दिला, त्याचं समाधान माना, महाराष्ट्राची प्रतिमा सांभाळा, असा टोला खसादार संजय राऊत यांनी लगावला आहे. दावोसमध्ये बसून तुम्ही पुन्हा पक्ष फोडण्याची भाषा करत आहात, लाज कशी वाटत नाही तुम्हाला ? मरण पत्करू पण यांना शरण जाणार नाही अशी आमच्या आमदार-खासदारांची भूमिका आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत…
खासदार संजय राऊत म्हणाले की, “ज्यांना जायचं ते बेईमान शेण खायला गेले यांच्यासोबत, पण आम्ही कशाला जाऊ ? आम्हाला या मराठी मातीचा स्वाभिनमान आहे, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे घडवलंय त्याचा आम्हाला अभिमान आहे. तिकडे ते काय करत आहेत ? तिथे ते शिंद्यांचेच आमदार फोडायला गेले आहेत. उदय सामंत हे भटकती आणि लटकती आत्मा आहेत, मुख्यमंत्री यांनी उद्योगमंत्री यांच्याकडून या दौऱ्याचा खर्च वसूल केला पाहिजे. तुम्ही स्वत: फुटलात, बेईमान झालात ना, तुमच्या कपाळावर बेईमानीची पट्टी लागली आहे. आता फक्त त्यांनी एवढंच सांगणं बाकी आहे की संजय राऊत, आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदेंना भेटलेत, सगळेच फुटणार आहेत, हे पवार साहेबांना भटकती आत्मा म्हटले होते, पण हे स्वत:च भटकती आणि लटकती आत्मा आहेत,” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी उदय सामंतांवर घणाघात केला आहे.