
रत्नागिरी: रविवारी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात कंटेनर आणि मिनीबस यांच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये जवळपास ३० शिक्षक जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असेल तर तात्काळ कळवा अशा सूचनाही त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना केल्या आहेत.रविवारी सकाळी आठ वाजता रत्नागिरी तालुक्यातील निवळी घाटामध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरची मिनी बसला जोरदार धडक बसली. या मिनी बसमध्ये चिपळूण आणि परिसरातून रत्नागिरीला प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शिक्षकांचा समावेश होता.
तब्बल ३० शिक्षक या बसमध्ये होते. या भीषण अपघातात हे शिक्षक जखमी झाले. त्यातील एका शिक्षकाची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांना जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं तर या कंटेनर मधून वायू गळती सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाल्याने नजीकच्या दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . या अपघाताची खा. नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर माहिती घेतली. याबाबत कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असेल तर ती तात्काळ कळवावी, तसेच अपघातग्रस्तांना योग्य ती मदत झाली पाहिजे, यात कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये अशा प्रकारच्या सूचना खा. राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.