
देवरूख येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न…
देवरूख- महाराष्ट्रातील शिक्षण हे जगातील आदर्शवत शिक्षण आहे. जगाच्या पाठीवर असे शिक्षण मिळू शकत नाही अशी भावना शिक्षण संस्थां चालकांमध्ये असली पाहिजे. मुलांशी आपण बांधिल आहोत या भावनेतून भविष्यातील आधुनिक जगाला जर सामोरे जायचे असेल तर नाविण्यपूर्ण उपक्रम आपल्या शिक्षण संस्थांमधून सुरू केले पाहिजेत. शासनाच्या सहकार्याने आपले विद्यार्थी परदेशात गेले पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी आज रविवारी देवरूख येथे केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ३६ वे एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन कोकण विभागात देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले कि, रत्नागिरी जिल्ह्यात पहिली नवीन शिक्षण संस्था काढण्याचे धाडस स्व. गोविंदराव निकम यांनी केले. ग्रामीण भागात अनेक शिक्षण संस्था आहेत. त्यांच्या कामात पारदर्शकता आहे. शिक्षण संस्था चालल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत याच्याशी मी सहमत आहे. परंतु शिक्षण संस्था चालकांनीही नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. महाराष्ट्रात प्रथम धर्मादाय शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्याचेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
आमदार शेखर निकम यांनी म्हटले कि, आज ग्रमीण भागातील पालक मुलांना शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यामुळे ग्रमीण भागातील शाळा बंद पडत आहेत. शासनाने बंद पडलेल्या शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे. शाळा टिकविणे, वाढविणे हे मोठे आव्हान आहे. एकाच शिक्षकाला सर्वच विषय शिकवावे लागत असल्याची आज ग्रामीण भागात परिस्थिती आहे. शासनाने शाळांना अनुदान दिले पाहिजे. शाळेत चित्रकला, कार्यानुभवचे शिक्षक असतील तर शाळेचा दर्जा चांगला राहतो.
महाराष्ट्रातील शाळांना विकलांग करण्याचे काम शासन करीत आहे. शिक्षणाचा विचार राजकारणाच्या पलिकडे जावून केला पाहिजे. शासनाने शिक्षक भरतीत हस्तक्षेप करू नये. शासनाने हस्तक्षेप केल्यामुळेच आज भरतीत घोटाळा होत असल्याचे विजय गव्हाणे म्हणाले. याप्रसंगी राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, म. रा. शि. संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अशोक थोरात, सहकार्यवाह विजग गव्हाणे, सहकार्यवाह रविंद्र फडणवीस आदि मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनासाठी राज्यातील विविध भागातील संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था चालकांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.