राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण…

Spread the love

राजापूर / जनशक्तीचा दबाव/ प्रतिनधी – राजापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ७५ फूट उंच राष्ट्रीय ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. कळ दाबून या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. रत्नागिरी येथील पोलीस क्रीडांगणावर १५० फूट उंचीचा आणि राज्यातील चौथ्या क्रमांकाचा असणारा ध्वज उभारला जात असल्याची माहिती यावेळी ना. यांनी यावेळी दिली.


    
या लोकार्पण सोहळयास खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पोलीस बॅंड पथकाने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत धून वाजवून ध्वजाला सलामी दिली. यावेळी तिरंग्यातील फुगे हवेत सोडण्यात आले. यानंतर कोनशिलेचे अनावरण ही  ना. सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.


   
पालकमंत्री श्री.सामंत यावेळी म्हणाले, स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात रायगडमध्ये १३ ठिकाणी आणि रत्नागिरीत ९ ठिकाणी ७५ फूट उंचीचे ध्वज उभे करणारे राज्यातील हे पहिले दोन जिल्हे आहेत. रत्नागिरी पोलीस क्रीडांगणावर १५० फूट उंचीचा राज्यातील चौथ्या क्रमांकाचा ध्वज उभारला जात आहे, तर ५ व्या क्रमांकाचा ध्वज रायगडमध्ये उभारण्यात येत आहे.

  
अमृत महोत्सवी वर्षात हे करु शकलो यासाठी १ कोटी ३० लाख रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यासाठी, विकासासाठी, देशासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले. त्यासाठी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी हा आदर्श आहे, असेही ते म्हणाले.

         
यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी वैशाली माने यांनी, तर तहसिलदार शीतल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page