हत्तीचा माळ, खेर्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावे,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत मागणी…

Spread the love

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील हत्तीचा माळ, खेर्डी (सध्याचे खेर्डी एमआयडीसी स्थळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीसाठी आमदार मा. शेखर निकम सर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री मा. उदय सामंत साहेब यांना निवेदन देण्यात आले.


ही मागणी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असून, १६ मे १९३८ रोजी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत खोती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या काळी अठरा पगड जातीतील बहुजन समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असला तरी बहुतांश समाज भुमीहिन होता आणि जमिनींची मालकी खोतांकडे होती. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली या खोती पद्धतीविरोधात लढा उभारण्यात आला व त्या ऐतिहासिक परिषदेनंतर बहुजन समाजाला हक्काची जमीन मिळवून देण्यात आली.

या ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारणे आवश्यक आहे, असे निवेदन समितीने दिले.

या वेळी समितीच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष आद. विठोबादादा पवार, सरचिटणीस हरिश्चंद्रजी पवार, सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव, उपाध्यक्ष उदयजी कदम, खजिनदार आयु. राहुल पवार, सल्लागार श्रीधरजी कदम, आर.बी. गमरे, चिपळूण विभाग सरचिटणीस आयु. मंगेश जाधव तसेच राजहंस पतसंस्थेचे संचालक आयु. अनिरुद्ध जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
सदर मागणीस पालकमंत्री उदय सामंत व आमदार शेखर निकम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आता या ऐतिहासिक मागणीला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळेल, अशी अपेक्षा परिसरातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page