
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण व भिवंडी या तिन्ही जागांवर दावा करत दबावतंत्र अवलंबिणाऱ्या भाजपला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची रणनीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली आहे.
भाजपच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून भिवंडी मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी शिंदे गटाने केली आहे.
महायुतीत मिठाचा खडा पडू नये, यासाठी भाजप नेत्यांच्या जाहीर दबाव तंत्राला आतापर्यंत उत्तर देणे शिंदे गटाने टाळले होते. मात्र मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला असून त्यातूनच कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठाणे, भिवंडीसह मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण वरही दावा ठोकला होता. कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही गायकवाड यांची बाजू उचलून धरली. त्यानंतर गेले काही महिने या प्रकारांकडे दुर्लक्ष करणारे शिंदे गटाचे नेते बुधवारपासून प्रति-हल्ल्याची रणनीती आखण्यासाठी अचानक सक्रिय झाल्याचे दिसले.