जखम झाल्यास त्यावर घरगुती उपाय व व आपल्या घरातील वस्तूंचा उपयोग कसा करावा….

Spread the love

▪️जखमेवर घरगुती उपाय :-

जखम छोटी असो वा मोठी त्याकडे दुर्लक्ष करू नये. काही वेळेला घरात काचेची भांडी फुटल्यामुळे तर अपघातामुळे त्वचेवर कापल्यासारख्या जखमा होतात. काचेपासून झालेल्या या जखमा भरून येण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. खोल जखमेसाठी डॉक्टरांचे उपाय आवश्यक आहेतच; पण इतर जखमांसाठी आपण घरगुती उपाय करून जखम बरी करू शकतो आणि संसर्गाचा धोका टाळू शकतो. जखम छोटी असेल तर सर्वप्रथम जखम स्वच्छ करावी, कारण व्यवस्थितपणे जखम स्वच्छ करणे हे ती थंड पाण्याच्या नळाखाली जखम झालेला भाग धरावा. यामुळे जखमेवर लागलेली धूळ, जीवजंतू निघून जाण्यास मदत होईल. शिवाय थंड पाण्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. नंतर स्वच्छ टॉवेलने हळूवारपणे जखम कोरडी करावी. त्यानंतर निर्जंतूक ड्रेसिंग करून किंवा बँडेज लावून ती जखम झाकावी.

▪️घरगुती उपाय-

हळद:-

हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक आणि प्रतिजैवीक घटक आहे. त्यामुळे हळदसुद्धा काचेमुळे झालेल्या जखमेसाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी वापरता येते. रक्‍तस्त्राव होत असल्यास त्यावर थेट हळदीची पूड भरून थोडा वेळ तसेच धरून ठेवले तर रक्‍तस्त्राव ताबडतोब थांबतो. जखम लवकर भरून येण्यासाठी अर्धा चमचा हळदपूड घेऊन त्यामध्ये जवसाचे तेल टाकून पेस्ट बनवावी. दिवसातून दोन-तीन वेळा ही पेस्ट जखमेवर लावावी. त्यामुळे वेदना कमी होतात आणि संसर्गदेखील रोखला जातो. तसेच ग्लासभर गरम दुधामध्ये एक चमचा हळदपूड टाकून दिवसातून एकदा घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी काही दिवस हळदमिश्रीत दूध घेतल्यास जखम भरून येण्यास मोठी मदत होते.

खोबरेल तेल:-

या तेलामध्ये जीवाणूनाशक, दाहविरोधी, त्वचा मुलायम करण्याचा आणि जखम भरून काढण्याचा अद्भूत गुणधर्म आहे. अनेक अभ्यासांतून हे सिद्ध झालेले आहे. खोबर्‍याच्या तेलामुळे त्वचेवर जखमेचे राहणारे डागसुद्ध अस्पष्ट होतात. असे हे गुणकारी खोबर्‍याचे तेल जखम झालेल्या भागावर लावावे. त्यावर बँडेज बांधावे. पुन्हा तेल लावावे आणि दिवसातून दोन-तीनवेळा बँडेज बदलावे. हा उपचार काही दिवस सुरू ठेवावा. त्यामुळे त्वचेवर जखमेच्या खुणा राहणार नाहीत.

कोरफड:-

हजारो वर्षांपासून कोरफड जखम भरून काढण्यासाठी वापरली जाते. कोरफडीमध्ये वेदनाशामक, दाहविरोधी आणि थंडावा देण्याचा गुणधर्म आढळून येतो. तसेच कोरफडीमध्ये फायटो केमिकल्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वेदना, जळजळ कमी होते. त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यामुळे ती जखम भरून येण्यास मदत होते. तसेच शस्त्रक्रियेनंतरची जखम भरून येण्यासाठीसुद्धा कोरफडीचा उपयोग होतो.

आहार:-

बाह्य उपचारांबरोबरच जखम भरून येण्यासाठी योग्य आहारसुद्धा गरजेचा असतो. म्हणूनच पोषक आहार घेणे हे सुद्धा गरजेचे असते. काही जीवनसत्त्वे आणि क्षार असे आहेत ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जखमा भरून आणण्याचा गुणधर्म असतो. म्हणूनच असे पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. ‘अ’ जीवनसत्त्व प्रचूर प्रमाणात असणारे गाजर, लाल भोपळा, टोमॅटो, खरबूज, जर्दाळू नियमितपणे खावेत. यामुळे पेशींची वाढ चांगल्याप्रकारे होण्यास मदत होते. तसेच ‘क’ जीवनसत्त्व युक्‍त पदार्थ म्हणजे, ब्रोकोली, द्राक्षे, किवी, संत्र, मिरची यांचा आहारात समावेश करावा. यामुळे शरीरात कोलेजन तयार होण्यास आणि नव्या उती तयार होण्यास मदत होते. गहू, बदाम, पालक यामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व असते. त्यांचा आहारात समावेश करावा. तसेच झिंक असणारे अन्‍नपदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये, बिया, शेंगा यांचाही आहारात समावेश करावा. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. तसेच बी-कॉम्प्लॅक्स जीवनसत्त्व असणारे अन्‍नपदार्थही नियमित खावेत. यामध्ये चीज, पालक, मासे, वाटाणा, चवळी यासारख्या शेंगा इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. यामुळे जखम लवकर भरून येते आणि त्वचाही उत्तम राहते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page