
*मुंबई-* राज्यात मान्सून सक्रीय झाला आहे. रात्रभर पावसाने सगळीकडे जोर धरला आहे. आज कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगडला रेड अलर्ट, मुंबईसह विदर्भ घाटमाथ्यावरही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातही समुद्र सपाटीपासून 3.1 ते 7.6 किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळं मान्सून आता सक्रीय झाला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने विदर्भ, गुजरात, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मान्सूनची प्रगती होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पहाटेपासुन मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई उपनगर सुद्धा जोरदार पाऊस असून परिणामी मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आज मुंबईत दिवसभर असाच पाऊस असण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. ३ः२३ वाजता समुद्राला मोठी भरती असून ४.३१ पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत समुद्र किनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.