करिअर कट्टा अंतर्गत स्वयंरोजगार प्रकल्पातील कलम बांधणी कार्यशाळा उत्साहात संपन्न…

Spread the love

चिपळूण, प्रतिनिधी : डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत स्वयंरोजगार प्रकल्पाच्या माध्यमातून कलम बांधणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक शेतीसोबत आधुनिक पद्धतीने स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच कौशल्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन निर्माण करणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी संगमेश्वर तालुक्यातील गौरव नर्सरीचे मालक श्री. संजय जोशी आणि श्री. प्रकाश जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सिद्धी कासार यांनी केले. त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना करिअर कट्टाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्व सांगितले.

यावेळी श्री. प्रकाश जोशी यांनी स्वयंरोजगाराच्या विविध संधींबरोबरच नर्सरी व्यवसायातून उत्पन्नाचे मार्ग याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कमी क्षेत्रफळात उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून नर्सरी व्यवसाय उभारता येतो आणि त्यातून नियमित उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागातील युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेतील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या कलम बांधणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आंबा बाटी कलम, खुंटी कलम, गुलाब कलम, पेरू कलम आणि चाफा कलम यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. कलम बांधणीसाठी आवश्यक साहित्य, योग्य पद्धत, कलमाची निगा, संगोपन तसेच त्यापासून रोपवाटिका व्यवसाय कसा उभारता येईल, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत प्रत्यक्ष कलम बांधणीचे तंत्र समजून घेतले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्राचार्या सौ. अंजलीताई चोरगे मॅडम यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या संधींचा उपयोग करून स्वयंरोजगार निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ग्रामीण भागातील युवकांनी शेती, रोपवाटिका, फळझाडांची कलमे तयार करणे तसेच विविध कृषीपूरक व्यवसायांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातच रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यास युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्राचार्यांनी केले. कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ कलम बांधणीचे तंत्र शिकता आले नाही, तर त्यातून नर्सरी व्यवसाय, कृषीपूरक उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधींची ओळख झाली. शिक्षणासोबत कौशल्य विकास आणि उद्योजकतेची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सतीश निर्मळ यांनी केले. त्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे, मार्गदर्शकांचे, प्राचार्यांचे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page