
संगमेश्वर /प्रतिनिधी-दि २९ मार्च- मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करत असताना संगमेश्वरनजीक निढळेवाडी येथे समोरील खोदकाम माहे नोव्हेंबर 2022 मध्ये करण्यात आले ज्यामध्ये समस्त निढळेवाडीवासीयांची हायवेवर येण्याची ग्रामपंचायतीने केलेली पाखाडी नष्ट झाली ही बाब ग्रामस्थांनी त्याचवेळी संबंधित कार्यकारी अभियंता यांची भेट निदर्शनास आणली असता त्यांनी तातडीने संरक्षक भिंत व पाखाडी बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र पुढे कोणतीही कार्यवाही न झाल्याने दिनांक 01.07.2023 रोजी नागरिकांचे वतीने पुन्हा पत्राद्वारे विनंती करण्यात आली होती.
तत्कालीन सार्व. बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिनांक 06.09.2023 रोजी हायवे पाहणी दौऱ्यात सरपंचांसह ग्रामस्थांनी मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले असता त्यांनीही नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय त्याच दिवशी सा. बां. अभियंता कुलकर्णी यांनीही स्वतः दूरध्वनीवरून आश्वासन दिले होते मात्र त्यांनी आजतागायत कोणतीही कार्यवाही केली नाही. चालायला वाट नसल्याने व पावसाळ्यात निसरडे झाल्याने अपघात होऊ लागले म्हणून ग्रामस्थांनी तात्पुरती व्यवस्था करून घेतली तसे कार्यकारी अभियंता जाधव याना कळविले. मात्र तत्पूर्वीच त्यांची नगरला बदली होऊन गेले होते. असे असतानासुद्धा ग्रामस्थांनी केलेल्या कामासाठी फाडीच्या खर्चाची रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून दिली. असे असूनही आज रस्त्यावर उतरण्यासाठी त्रासाचे होत आहे. कुलकर्णी अनेकदा भेटूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. रस्त्यावर व्हिलेज बोर्ड लावले नसल्याने प्रवासासाठी त्रासाचे होत आहे.
नागरिकांकडून आलेल्या निवेदने वा तक्रारीवर पंधरा दिवसात कार्यवाही करावी असे ऑफिसच्या फलकावर आहे. मात्र दोन वर्षे लोटूनही विभागाकडून पत्राचे साधे उत्तरही देण्यात आलेले नाही. जे कार्यालयीन कार्यपद्धतीविरुद्ध आहे. तरी दोघाही मंत्र्यांचे आदेशाचे अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन निढळेवाडीवासीयांसाठी हायवेवर पोहोचण्याची तसेच व्हिलेज बोर्ड लावण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

