कोकण रेल्वे मार्गावरूनलवकरच कंटेनर वाहतूक

Spread the love

मुंबई :- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड स्थानकातून लवकरात लवकर कंटेनर वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, काँनकॉर, कस्टम विभाग आणि महाप्रित यांचा एक मेळावा मुंबई-बीकेसी येथे झाला. या मेळाव्यात कोकण रेल्वे मार्गावरून खेड येथून कंटेनर वाहतूक करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
खेड रेल्वे स्थानकातून कंटेनर वाहतुकीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे दाखल आहे. या अनुषंगाने या अंतर्गत येणार्‍या विविध विभागांना एकाच छताखाली आणण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला. काँनकॉरचे चेअरमन संजय स्वरूप यांनी काँनकॉरने रत्नागिरी आणि खेडमध्ये व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि खेडमधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीचे फायदे सांगितले.
कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात असलेल्या गोदाम, शीतगृह अशा विविध सुविधांची माहिती दिली. तसेच कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी विविध योजनांतर्गत उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधांबाबत माहिती दिली. काँनकॉरच्या कमल जैन यांनी खेडमध्ये उद्योजकांना काँनकॉरकडून दिल्या जाणार्‍या विविध सुविधांची माहिती दिली. जेएनपीटीचे सीमाशुल्क उपायुक्त रामदास काळे यांनी व्यापाराशी संबंधित सीमाशुल्क विभागाचे नियम आणि बदलत्या काळातील व्यापार यावर मार्गदर्शन केले. या व्यापारी मेळाव्यात खेड, चिपळूण येथून आलेल्या उद्योजकांनी अनेक शंका, प्रश्न उपस्थित केले आणि त्यांचे शंका निरसन कोकण रेल्वे,काँनकॉर आणि सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून करण्यात आले.
मुंबईत मंगळवारी झालेल्या व्यापारी मेळाव्यात विविध विभाग आणि उद्योजक एकत्र आल्याने कोकण रेल्वे मार्गावर व्यापार वृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात महत्त्वाचे पाऊल पडले आहे. खेडमधून फेब्रुवारीच्या मध्यापासून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page