![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2024/01/1000281513.jpg)
इंफाळ- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला आज मणिपूरमधून सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी यावेळी भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. राहुल गांधी यांनी यावेळी मणिपूरच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेत्यांना मणिपूरमध्ये पोहोचण्यास विमानामुळं उशीर झाला. यामुळं राहुल गांधी यांनी मणिपूरच्या जनतेची माफी मागितली. मणिपूरच्या जनतेशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी २९ जूननंतर मणिपूरमध्ये राज्य व्यवस्थेची पायाभूत रचना उद्धवस्त झाल्याचा आरोप केला. राज्यात द्वेष पसरला आहे, असा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.
भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरपासून ६ हजार ७१३ किलोमीटर अंतर पार करून २० मार्च रोजी मुंबईमध्ये समाप्त होणार आहे. यादरम्यान, राहुल गांधी हे ६०-७० काँग्रेस नेत्यांसह बसच्या माध्यमातून हे अंतर पार करणार आहेत. तसेच ही यात्रा काही प्रमुख ठिकामी पायी प्रवास करणार आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत प्रवार केला आहे. ३५०० किमी चाललेली ही भारत जोडो यात्रा १२ राज्यांमधून गेली होती. तर भारत जोडो न्याय यात्रा १५ राज्यांमधून प्रवास करणार आहेत.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या यशावर सकारात्मक परिणाम होईल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही ६७ दिवसांमध्ये ११० जिल्ह्यामधून जाणार आहे. या यात्रेत राहुल गांधी हे तब्बल ३५५ लोकसभा मतदारसंघांना कव्हर करणार आहेत. हा आकडा देशातील एकूण लोकसभा मतदारसंघांपैकी ६५ टक्के एवढा आहे. २०१९ मध्ये भाजपाने या ३५५ मतदारसंघांपैकी २३६ मतदारसंघात विजय मिळवला होता. तर काँग्रेसला केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. ही यात्रा मध्य प्रदेश छत्तीसगड या राज्यांतूनही जाणार आहे. या राज्यांत काँग्रेसचा नुकताच पराभव झाला होता.