![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/03/MRC-091220-Depressive-symptoms-in-young-people-735x490-2.jpg)
कुठल्याही पालकांना वाटत नाही की आपलं मूल डिप्रेशन मध्ये जावे. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या भविष्य साठी झटत असतात, पण तरीही मुल डिप्रेशन मध्ये जाते, अशावेळेस “असं का घडलं” हा प्रश्न पालकांना सतावतो. प्रत्येक पालकांना स्वतःच पालकत्व हे आदर्श वाटत असते, पण ते खरंच आदर्श आहे का की आपल्या पालकत्वामध्ये काही चुका आहेत हे पालकांना समजून घेणे गरजेचे आहे.
आपलं आणि आपल्या मुलांचं नातं कसं आहे यावर मुलांचे भाव विश्व अवलंबून असते. जेव्हा मूल कुठली चूक करते किंवा वारंवार त्याच त्या चुका परत परत करते अशा वेळेस पालक म्हणून आपण समजून घेण्याऐवजी त्याच्यावर ओरडत राहतो, त्याला सतत शिक्षा करीत राहतो, त्याच्या मनाचा विचार न करता त्याचा चारचौघांमध्ये सहजच आपण अपमान करतो. अशावेळी मुलांना स्वतःचा स्वाभिमान आहे या गोष्टीचाच मुळी पालकांना विसर पडतो.
मुलांना सतत वाटणारी भीती हे सुद्धा डिप्रेशनचे महत्त्वाचे कारण आहे मग आपल्या मुलाला कशाची भीती वाटते? शाळेची, अभ्यासाची, शिक्षकांची, आजूबाजूच्या वातावरणाची, मुलांमध्ये खेळण्याची, एकट राहण्याची किंवा आपली ह्या गोष्टी पालकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.मुलांना कसली भीती वाटत असेल तर त्या भीती मागचं कारण समजून न घेता त्याला रागवलं जातं. बऱ्याच घरामध्ये मुलांना अंधाराची भीती वाटते ही भीती दूर करण्यापेक्षा पालक त्याला एकट्याला अंधारात जाऊन काहीतरी वस्तू आणायला सांगतात. त्यावेळेस त्याच्या मनाचा विचारही केला जात नाही. अशावेळी पालकांना वाटतं की मी मुलाची भीती कमी व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पण याचा उलट परिणाम मुलांच्या मनस्थितीवर होतो. मुल अजून घाबरून तर जातेच परंतु आई वडिलावर असणारा त्याचा विश्वास तोही कमी होत जातो आणि ते आपल्या विश्वामध्ये बंदिस्त होऊ लागते. आपल्या मुलांच्या बाबतीत असं काही घडू नये यासाठी पालकत्व समजून घेणे गरजेचे आहे.