महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार:अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा, आमदारकीही सोडली; नाना पटोले तातडीने दिल्लीला…

Spread the love

▪️मुंबई/ 12 फेब्रुवारी 2024-
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन आपल्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली असून, नाना पटोले तातडीने पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झालेत.

▪️अशोक चव्हाण काय म्हणाले राजीनाम्यात?…

मी दिनांक 12/02/2024 रोजी मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याद्वारे सादर करीत आहे, असे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सादर केलेल्या आपल्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्यात म्हटले आहे. या पत्रावर अशोक चव्हाण यांनी माजी विधानसभा अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अशोक चव्हाण यांनी एका ट्विटद्वारे आपल्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे.

▪️अमित शहांच्या उपस्थितीत भाजपत जाणार?…

भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयाबाहेर मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे अशोक चव्हाण आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.

▪️गत अनेक दिवसांपासून सुरू होती चर्चा…

गत अनेक महिन्यांपासून अशोक चव्हाण भाजपत जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले होते. पण आता अचानक त्यांनी विधानसभा सदस्यत्व व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर आता ते लवकरच भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. अशोक चव्हाण काँग्रेसचे बडे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आहे.

नांदेडमधील अशोक चव्हाण यांच्या गोटातील कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण भावी खासदार असे स्टेटस ठेवले आहे. त्यामुळे ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याचीही चर्चा आहे.

▪️ज्याला गरज आहे तो भाजपत येतो – चिखलीकर

भाजपला कुणाचीही गरज नाही. पण ज्याला गरज आहे तो भाजपमध्ये येतो. अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याची अनेक कारणे असतील. त्यावर आताच बोलता येणार नाही. अशोक चव्हाण यांच्या येण्याने लातूर, नांदेड व हिंगोलीत कोणताही फरक पडणार नाही. मी त्यांनी हरवून जिंकलो आहे. याठिकाणी भाजप पूर्वीपासूनच बळकट आहे, पण त्यांच्या येण्याने ही बळकटी आणखी वाढेल, असे भाजपचे नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर पाटील यांनी या प्रकरणी म्हटले आहे.

▪️काँग्रेसला सलग धक्के

अशोक चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते भाजपत गेले तर तो काँग्रेसला मोठा धक्का बसेल. विशेष म्हणजे गत आठवड्यातच काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तत्पूर्वी, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही शिवसेनेच्या सत्ताधारी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांच्या रुपाने एक बडा मासा भाजपच्या गळाला लागला तर महाराष्ट्र काँग्रेस अजून खिळखिळी होईल असा दावा केला जात आहे.

मविआ सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी होते गैरहजर…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीचे काही आमदार विधानसभेत गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याची गंभीर दखल घेत याचा अहवाल मागवला होता. या घटनाक्रमामुळे पहिल्यांदा अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. आता ही चर्चा प्रत्यक्षात येते की काय? अशी स्थिती आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page