रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प, एसटीसह प्रवासी अडकले…

Spread the love

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड तालुक्यातील रघुवीर घाटात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दरड कोसळून माती आणि दगड रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या घटनेमुळे सातारा  जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
    

दरड कोसळलेल्या ठिकाणी खेड-अकलपे एसटी बस तब्बल दीड तासांहून अधिक काळ घाटातच अडकून पडली होती. बसमध्ये शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवासी असल्याने त्यांच्या सुरक्षिततेची चिंता निर्माण झाली होती. घाटमाथ्यापलीकडील गावांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांनाही रस्त्यातच थांबावे लागले. मात्र, या कठीण प्रसंगी स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. त्यांनी गावातील छोटी वाहने घटनास्थळी आणून एसटी बसमधील शालेय विद्यार्थी, महिला आणि इतर प्रवाशांना सुरक्षितपणे घाटमाथ्यापलीकडे त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवले. स्थानिकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे,
गेल्याच आठवड्यात याच ठिकाणी डोंगराचा मोठा भूभाग खचून रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. त्यानंतरही परिसर धोकादायक असतानाच पुन्हा मुसळधार पावसामुळे धबधब्यांनी विक्राळ रूप धारण केले असून, रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यातच दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली. घटनेनंतर संबंधित यंत्रणा दरड हटवून रस्ता पूर्ववत करण्याच्या कामाला लागली असून, मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना रघुवीर घाटातून प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page